नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती हाेत नाही, बायकाेचा त्याग करून हाेत नाही, तसेच जनांत राहून हाेत नाही, वनांत राहिल्यानेही हाेत नाही, खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही की जे केल्याने त्याची प्राप्ती हाेईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यापैकी काय करीत नाहीत? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून काय, की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती हाेते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती हाेते? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे, ईश्वराची प्राप्ती, व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे, ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे माेठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगाेदर बळकट असावा लागताे, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला ार अडचण पडत नाही, आणि हे व्हायला भाग्य लागते. तळमळ लागल्यावर सर्व भाेगांचा त्याग करावाच लागताे असे नाही, आपण रामाचे आहाेत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहाेत असे वागले पाहिजे, म्हणजे मनाने त्याचे झाले पाहिजे. असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का? आपण नाेकरी करताे.
त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का? तसे, आपण मनाने रामाचे आहाेत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला हाेताे, कारण आपण ज्याला शरण गेलाे त्याला त्याची लाज असते. रामाने तरी काय केले? त्याला विभीषण शरण आला तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की, ‘जाे मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे.’ शरणागताला नुसते जीवदान देऊन ताे राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगताे की, जाे त्याचा हाेऊन राहताे त्याची लाज रामाला असते. माझ्याकडे इतकेजण येतात, पण एकाने तरी ‘मला रामाची प्राप्ती करून द्या’ म्हणून विचारले का? मी आलाे आहे ताे काय तुमचे विषय पुरविण्यासाठी? समजा, एकजण चाेरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की, ‘मला जर आज चाेरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर साेन्याचा कळस चढवीन, तर आता सांगा, त्या मारुतीने काय द्यावे? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, ‘मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे, आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच हाेऊ नये.’ म्हणजे मग आपल्याला त्याचे हाेऊन राहता येईल.