मुंबई, 9 जून (आ.प्र.) :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देणे, आदी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे.
याच दृष्टिकोनातून विमान वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून, ग्रामीण उत्पादकांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला शहरी बाजारपेठेशी जोडणे, समन्वय साधण्यासाठी शासनस्तरावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत (एमएडीसी) पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच नागरी आणि खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, हरित आणि स्मार्ट विमानतळ विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. याविषयी पांडे यांनी जय महाराष्ट्रमध्ये माहिती दिली आहे. ही मुलाखत मंगळवारी (10 जून) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे.