पुणे, 8 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
मार्केटयार्ड फळबाजार आणि तरकारी विभागात अनधिकृतपणे किरकोळ विक्री करणाऱ्या आडत्यांच्या डमींचा पुन्हा सुळसुळाट झाला आहे. बाजारात मिळेल त्या जागेवर व्यापार करा अशी परिस्थिती झाली आहे. आडत्यांच्या डमींमुळे फसवणूक आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना बाजार समिती संचालक मंडळाचे लक्ष भलतीकडेच असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीने नियम घालून गाळ्यावर शेतमाल विक्रीला मदतनीस नावाखाली दोन डमी व्यापाऱ्यांना काम करण्याची नियमबाह्य परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्याक्षात एका गाळ्यावर आडतदार सोडून 5 ते अगदी 8 आडत्यांचे डमी व्यापारी शेतमाल विक्रीचा व्यावसाय करीत आहेत. यातून समितीला कोणतेही शुल्क मिळत नसल्याने समितीचे नुकसान होत आहे. तर, तरकारी, फळबाजारात पंधरा फुटांपर्यंत शेतमाल लावण्यास परवानगी असताना काहीजण रस्त्याच्या मध्यभागापर्यंत व्यापार करतात. तरकारी विभागात रस्त्यावरच वजनकाटे थाटलेले आहेत.
ग्राहकांसह कामगारांना शेतमालाची ने-आण करताना मोठी कसरत करावी लगते. याकडे कोणीही लक्ष देत नाही. मोकळ्या जागांचं भाडं नक्की खातंय कोण? मार्केटयार्डातील फळबाजार, तसेच तरकारी विभागात स्वच्छतागृहे, पतसंस्था, विविध संस्था संघटनांच्या कार्यालयाजवळील आणि कार्यालयामागील मोकळ्या जागेवर डमी आडत्यांनी कब्जा केला आहे. त्या जागांचे भाडे नक्की कोणाच्या खिशात जाते हे अद्याप समजलेले नाही. तर, गेट क्रमांक 1 आणि 3 वर माननीयांनीच ताबा मारला आहे. गाळ्यावरून मूळ गाळेधारकाकडून कमी पैशात शेतमाल घेऊन तोच शेतमाल डमी व्यापारी गाळ्यासमोर चढ्या दराने दुबार विक्री करतो. यामुळे शेतकऱ्याला कमी पैसे मिळतात. तर, मूळ गाळेधारकाला डमी व्यापाऱ्यांकडून भाड्यापोटी वर्षाला सुमारे दीड ते तीन लाखापर्यंत उत्पन्न मिळते. बाजार समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.