पिंपरी, 7 मे (आ.प्र.) :
कामगार आणि मराठी साहित्य याचा अनुबंध साधण्याच्या सफल प्रयत्नातून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित कामगार सत्कार आणि कविसंमेलनात 22 कवी-कवयित्रींनी ‘कामगार' आणि ‘मी मराठी' या विषयांवर विविध कवितांचे सादरीकरण केले आणि मालक आणि कामगार यांचे संबंध कसे असायला हवेत, याबाबत कामगार या कवितांमधून आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमात जालिंदर कांबळे, सायली थोरात, स्वानंद राजपाठक, समाधान शिंदे, संजय भगत आणि विजय चव्हाण या कामगारांचा शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी व्यासपीठावर उद्योजक विक्रम माने, अतुल इनामदार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरीचिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, वसंत गुजर, भारती फरांदे, मकरंद बापट, विनीता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, अशोककुमार पगारिया, श्रावणी पेठे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्या कामगारांना वाचनाची आवड आहे, ज्यांनी साहित्यिकांची पुस्तके वाचली आहेत, तर ज्यांनी पुस्तके लिहिली आहेत अशा कामगारांना विविध कारखाने व उद्योगांतून निवडण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडला रायगड येथील ‘साहित्यसंपदा' या संस्थेकडून उत्कृष्ट शाखा म्हणून मिळालेला पुरस्कार पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला.
उद्योजक विक्रम माने आणि अतुल इनामदार, वसंत गुजर यांनी आपल्या मनोगतात शाखेचे अभिनंदन; तसेच शाखेच्या कार्याचा गौरव केला. कामगारांतर्फे स्वानंद राजपाठक यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. तद्नंतर झालेल्या कविसंमेलनात सुभाष चटणे, रजनी द्विवेदी, सीमा गांधी, अशोक सोनावणे, विलास वानखडे, निलिमा फाटक, सुरेश सेठ, प्रतिमा काळे, शशिकला देवकर, बाळकृष्ण अमृतकर, चंद्रकांत धस, बाबू डिसोजा, सुहासिनी येवलेकर, संतोष गाढवे, नरेश मस्के या कवींनी सहभाग घेऊन आपल्या कवितांमधून कामगार व मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. किरण लाखे, जयश्री श्रीखंडे, किरण जोशी यांनी संयोजन केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले, तर संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत जोशी यांनी आभार मानले.