पुणे, 5 जून (आ.प्र.) :
येथील स्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने अंजली देशपांडे लिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन ॲड. अनिल पाठक यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये नुकतेच झाले. अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रख्यात गायिका चारूशीला बेलसरे उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी ‘जयोस्तुते' हे स्वातंत्र्यस्तोत्र, बलसागर भारत होवो, खरा तो एकचि धर्म आणि ध्वजगीत सादर केले. विनायक देशपांडे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर कवयित्री अंजली देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले व काही निवडक कविताही सादर केल्या. अरविंद नेरकर यांनी अध्यक्षीय भाषणात असे मत व्यक्त केले की, कमीतकमी शब्दांत, जास्तीत जास्त आशय व्यक्त करणाऱ्या अंजली देशपांडे यांच्या कविता वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसेच प्रचलित गीतरचना कवितांची आठवण करून देणाऱ्या आहेत. नेहा हवेली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.