नांदेड सिटी, किरकटवाडी, खडकवासला परिसराला बसला फटकासिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या एका ओढ्याच्या पुलावरील कचरा अज्ञाताने पेटवल्यामुळे महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्या जळाल्या. यात दाेन उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नांदेडगाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भाग या परिसरात मंगळवारी सकाळी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला हाेता.नांदेड सिटी गेटजवळील ओढ्यावरील पुलाच्या कठड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा सकाळी अज्ञात व्यक्तीने पेटवला. मात्र, कठड्यावरून जाणाऱ्या महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्यांनी पेट घेतला. त्यामुळे खडकवासला व धायरेश्वर या दाेन उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी नांदेडगाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीच्या काही भागातील सुमारे 18500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
अग्निशामक दलाने ही आग विझवल्यानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंताकल्याण गिरी, सहायक अभियंता सचिन आंबवले व सहकाऱ्यांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची उपाययाेजना केली. त्यानंतर दीड ते पावणेदाेन तासांत टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या घटनेत महावितरणचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच, पाेलस ठाण्यात कचरा पेटवणाऱ्याविराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ सुका व ओला कचरा टाकल्यामुळे किंवा कचऱ्याने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धाेका निर्माण हाेताे. वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.