अनेक वर्षांपासूनची जमीन माेजणीची मागणी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ 12 दिवसांत मान्य केल्याने माटुंग्यातील साई विसावा एसआरए सहकारी हाऊसिंग साेसायटीच्या अध्यक्षा पद्मा नायडू यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. माेजणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठीचे नगर भूमापन अधिकाऱ्यांचे पत्र केसरकर यांच्या हस्ते नायडू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच ‘जनतेशी सुसंवाद’ आयाेजिण्यात येत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.केसरकर दर बुधवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेशी सुसंवाद साधत आहेत. या कार्यक्रमप्रसंगी आमदार सर्वश्री कालिदास काेळंबकर,कॅ. तमिळ सेल्वन, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधाेंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियाेजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
जनतेशी सुसंवाद कार्यक्रमामुळे नागरिकांची कामे जलदगतीने हाेऊ लागल्याची भावना येथे येणारा प्रत्येक नागरिक व्यक्त करू लागला आहे. साइविसावा संस्थेमार्फत 18 ऑक्टाेबरच्या सुसंवाद कार्यक्रमात जमीन माेजणीच्या मागणीचे पत्र देण्यात आले हाेते. ते तत्काळ मान्य करण्यात येऊन या बुधवारी त्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र देण्यात आले. याबद्दल सर्व रहिवाशांच्या वतीने नायडू यांनी आनंद व्यक्त करून केसरकर यांचे आभार मानले.संजय गांधी निराधार याेजनेंतर्गत लाभाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी मागण्यांची तातडीने पूर्तता हाेऊ लागली आहे. केसरकर यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. यापुढे प्रत्येक कामासाठीची कालमर्यादा निश्चित करून दाखले देण्याची कामे पूर्ण व्हावीत. तसेच, नागरिकांना तसे कळवण्यात यावे, असे निर्देश केसरकर यांनी दिले.