पीएम कुसुम याेजनेत देशात पहिले स्थान पटकावून राज्याने शेतकरी हिताच्या याेजनांच्या अंमलबजावणीतील बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळिराजाचे असून, त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहाेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे काैतुक केले आहे. राज्याने सुमारे 71 हजार 958 साैर पंप स्थापित केले आहे.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या याेजनेला यापूर्वीच गती देण्यात आली हाेती. त्यांच्या पुढाकाराने ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित साैर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम याेजना प्रभावीपणे राबवली आहे. या अव्वल स्थानासाठी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांचे पुढाकारासाठी आणि महाऊर्जाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले आहे.
राज्यात नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा बळिराजाला सिंचनासाठी खात्रीलायक पर्याय उपलब्ध हाेईल. हा पर्याय कमी खर्चाचा आणि विश्वासाचा आहे. या याेजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना साैर कृषी पंप मिळावेत असे शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी महाऊर्जाने आपल्या या कार्यप्रणालीत सातत्य राखावे.तसेच, शेतकऱ्यांमध्ये या ऊर्जा स्राेताविषयी आणखी जागरूकता निर्माण करावी. महाराष्ट्राचे स्थान कायमच अव्वल राहावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.पीएम कुसुम याेजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पाेर्टल विकसित करण्यात आले आहे. महावितरणकडे कृषिपंप जाेडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता साैर कृषिपंप देण्याच्या याेजनेवरही भर देण्यात येत आहे. राज्याने पुढील पाच वर्षांसाठी पाच लाख कृषिपंपांना मान्यता दिली आहे.