केंद्र-राज्य सरकारच्या याेजना शेवटच्या घटकांपर्यंत पाेहाेचवा

03 Aug 2022 12:34:40
 
 

CM 
 
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला केंद्रीय याेजनांच्या अंमलबजावणीचा आढावा नव्या सरकारकडून पंतप्रधानांनी माेठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या याेजना शेवटच्या घटकांपर्यंत पाेहाेचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पाेहाेचावे, आपली कार्यक्षमता वाढवताना एकमेकांत समन्वय ठेवावा. तसेच, याेजनांत नागरिकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील सर्व याेजनांच्या लाभार्थ्यांना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचे पत्र पाठवा, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या याेजना किती प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पाेहाेचल्या आहेत, याचा विस्तृत आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना याेजनांच्या अंमलबजावणीविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या. प्रारंभी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी बैठकीच्या आयाेजनाविषयी प्रास्ताविक केले, तर उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी सादरीकरण केले.
 
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध याेजनांच्या बाबतीत काही सूचना केल्या. राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांतील एका गावात पालक सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मुक्काम करावा. वैयक्तिक लाभार्थ्यांना आपल्या स्वाक्षरीचे पत्र द्यावे.नागरिकांचा याेजनांतील सहभाग वाढेल असे पाहावे. विशेषत: जलजीवन मिशन, काैशल्य विकास, प्रधानमंत्री आवास याेजना, जनआराेग्य याेजना, अटल पेन्शन याेजना, पीएम गतिशक्ती, क्षयराेगाचे उच्चाटन, पीएम स्वनिधी याेजना, राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण, अशा विविध 14 याेजनांच्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला.या बैठकीत अमृत सराेवर, अर्बन जलधराेहर संरक्षण, तंत्र आणि वैद्यकीय शिक्षण मराठीत देण्यासाठी भाषातज्ज्ञांचे मंडळ स्थापन करणे, जीएसटी अंमलबजावणी, जेम पाेर्टलवरील खरेदी, असंघटित कामगारांची नाेंदणी, गाेबर धन बायाे सीएनजी, पीक विकेंद्रीकरण, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा याेजना, राष्ट्रीय पशुराेग नियंत्रण कार्यक्रम, आधार सेवा, क्रीडा उपक्रम तालुक्यापासून जिल्ह्यांपर्यंत आयाेजित करणे, अंगणवाडी दत्तक घेणे, अशा केंद्राच्या उपक्रमांवरही चर्चा झाली.
Powered By Sangraha 9.0