वारकऱ्यांसाठी एसटीने आराेग्य शिबिरे घ्यावीत

    20-Jun-2022
Total Views |

Varkari
अ‍ॅड. अनिल परब यांचे निर्देश : नाममात्र दरात पाणी उपलब्ध कराव आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून असंख्य पालख्या आणि भाविक श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना हाेत असतात. लाखाेंच्या संख्येने येणारे वारकरी व भाविकांची संख्या पाहता त्यांच्या आराेग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी एसटीने पंढरपूरमध्ये आराेग्य शिबिरे आयाेजित करावीत. तसेच त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले. दरम्यान, एसटीने वारकऱ्यांसाठी केलेल्या साेयी-सुविधांची अ‍ॅड. परब स्वत: पाहणी करणार आहेत.पंढरपूर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत अ‍ॅड. परब यांनी हे निर्देश दिले. या वेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
 
पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या वाहतुकीला अनन्यसाधारण महत्त्व असते. सर्वसामान्य नागरिक एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची, तसेच नागरिकांची काळजी घेणे एसटीचे काम आहे. पंढरपूरला तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार स्थानकांवर वारकरी, भाविकांसाठी शिबिर घ्यावे, असे अ‍ॅड. परब यांनी सांगितले.आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून लाखाेंच्या संख्येने नागरिक पंढरपूरला येतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे. नागरिकांनी ग्रुप बुकिंग केले, तर त्यांना गावच्या ठिकाणापासून ते पंढरपूरमध्ये विठूरायाच्या दर्शनानंतर थेट त्यांच्या गावात साेडण्याची व्यवस्था करावी, असेही परब यांनी सांगितले.