शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार : वर्षा गायकवाड

    14-Jun-2022
Total Views |
 
 

School 
 
विद्यार्थ्यांसाठी पूरक शैक्षणिक साहित्य; शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शाेध घेऊन प्रवेश देण्याची सूचना ‘बालकांचा माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयाेगटांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शाेध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा.शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगार वस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे, अशा सूचना प्रा. गायकवाड यांनी दिल्या आहेत.
 
मागील काही कालावधीत काेराेनामुळे अनेक दिवस शाळा बंद हाेत्या.या काळात स्थलांतराचे प्रमाणही अधिक हाेते. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबाह्य मुलांचा शाेध घेण्याची आवश्यकता अधिक भासू लागली. यासाठी शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांच्या नाेंदणी व शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्टच्या विद्यमाने ‘बालरक्षक’ अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.यासंदर्भातील कार्यवाही शिक्षण संचालकांमार्फत (प्राथमिक) करण्यात येत आहे.शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करणे, तसेच काेराेनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.
 
समग्र शिक्षाअंतर्गत शाळाबाह्य बालकांसाठी विशेष प्रशिक्षण आयाेजिण्यात येत आहे. यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मित्र’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली असून, वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक मार्गदर्शिका’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सहाय्य म्हणून विषयनिहाय व्हिडिओ निर्मिती करण्याचे नियाेजन आहे, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.