राज्यातील एकमेव शहर : महापालिकेचे सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियान देशात द्वितीय
स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये 10 ते 40 लाख लाेकसंख्येच्या देशातील माेठ्या शहरांत नवी मुंबईस देशात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला आहे.नवी मुंबईस कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन मिळाले असून, हे मानांकन मिळवणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महापालिका आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या विशेष समारंभात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हा सन्मान केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते स्वीकारला. केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित हाेते.नवी मुंबई पालिकेस सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशातील द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
त्याचप्रमाणे ओडीएफ कॅटॅगिरीत वाॅटरप्लस या सर्वाेच्च मानांकनाने सन्मानित करण्यात आले. या समारंभास आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाेले, प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत मिशन कक्ष विभागांचे उपायुक्त डाॅ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ 2 उपायुक्त अमरिश पटनिगेरे उपस्थित हाेते.
शहर स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी सक्रिय भाग घेत केलेल्या स्वच्छता कार्याचे फलित म्हणजे हे राष्ट्रीय सन्मान असल्याचे सांगत आयुक्तांनी हे पुरस्कार स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केले.
यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 3 सत्रांत कागदपत्रे तपासणी, तसेच नागरिकांचे अभिप्राय या पद्धतीने परीक्षण करण्यात आले.
याशिवाय अखेरच्या परीक्षणात केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांद्वारे पूर्वकल्पना न देता पालिका क्षेत्रातील स्थळांची 3 वेळा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी करताना परीक्षण समिती सदस्यांनी नागरिकांकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेतले.काेराेना कालावधीतही शहर स्वच्छतेकडे जराही दुर्लक्ष हाेऊ न देता काेराेनाग्रस्त विलगीकरणात असलेल्या घरांतील कचरा संकलित करून त्याची विल्हेवाटही त्याच सुरक्षित पद्धतीने लावण्याकडे पालिका विशेष लक्ष देत आहे.