अहमदाबाद, ७ ऑगस्ट (वि.प्र.) : सौराष्ट्रातील २५०० टन कांदा गुजरातेतील ढोराजी रेल्वे स्थानकातून निघाला असून, तो काही तासात बांगला देशात पोचतो आहे. ही रेल्वेने केलेली चमकदार कामगिरी मानली जाते. कांदा घेऊन जात असलेल्या मालगाडीला ४२ डबे आहेत. तीन दिवस प्रवास करून ही गाडी दर्शना या बांगला देशातील स्थानकात पोचेल. प्रवासी वाहतूक बंद असल्याने मालगाडी लवकर पोचणार असल्याचे रेल्वे अधिकारी व्ही. के. टेलर यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीचा फायदा घेऊन मालवाहतुकीतून अधिक महसूल मिळवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट असून, त्यासाठी खासगी आणि सरकारी उद्योग, शेतकरी संघ, पणन बाजार यांना माहिती देण्यात आली आहे. सध्या हॉटेल बंद असल्याने कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दर कोसळले आहेत. अशा वेळी रेल्वेने माल निर्यातीची संधी उत्पादकांना मिळाली आहे.