पालिकेने केलेल्या विविध उपायांना यश : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर
ठाणे, ११ ऑगस्ट (आ.प्र.) : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली आहे. तसेच, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर आले आहे. जूनमध्ये हे प्रमाण २७ टक्क्यांच्या आसपास होते. याच कालावाधीत रुग्ण दुपटीचा कालावधी २७ दिवसांवर होता. तो आता ७८ दिवसांवर आला आहे. गेल्या काही दिवसांत शहरात कोरोनाची संख्या कमालीची वाढली आहे. परंतु, रुग्ण दरवाढीचा वेग ७८ दिवसांवर आला आहे. शहरात २२ हजार ४ कोरोनाबाधित आढळून आले असून, आतापर्यंत ६९५ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, त्यातही गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १८१५१ एवढी झाली आहे, तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३४५ एवढी आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर आले आहे. दुसरीकडे महापालिकेने शहराच्या विविध भागांत केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांची संख्याही घटते आहे. शहरातील झोपडपट्टी भागातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मुंब्य्रासारख्या भागात शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, तर रविवारी दोन रुग्ण आढळले. लोकमान्य नगरमध्येही रुग्णांची कमी करण्यात काहीसे यश आले आहे. आता प्रत्येक दिवशी घरोघरी जाऊन स्किंनिंग प्रमाण ३० हजारांहून अधिक झाले आहे. त्यात ताप सर्वेक्षणही केले जात आहे. तसेच, ऑक्सिजनची मात्राही तपासली जात आहे. या उपाययोजनांमुळे साखळी तोडण्यात मदत झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.