बुंदेलखंडात एक विचित्र परंपरा आहे, जी दरवर्षी पाळली जाते, गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींची चोरी केली जाते.पूर्वी केवळ ग्रामीण भागात पाळली जाणारी ही प्रथा आता शहरी भागातही दिसून येते. लग्नाळू तरुण-तरुणी गणेशाची विसर्जनासाठी आणलेली मूर्ती विसर्जनापूर्वीच चोरी करून घरी नेतात. त्याची विधिवत पूजा करतात व लग्न झाले की मगच मूर्तीचे विसर्जन करतात, अशी ही प्रथा आहे. या भागात असा समज आहे की, विसर्जनापूर्वीच गणेशमूर्ती चोरून आणून तिला लग्न झाल्याशिवाय विसर्जन करणार नाही, असे म्हणून तिची पूजा केली जाते, मग गणपती आपली मनोकामना पूर्ण करतो अशी त्यांची श्रद्धा आहे. ही प्रथा अजूनही संगणकाच्या युगात पाळली जात आहे. ज्यांच्या विवाहमार्गात अडचणी असतात, असे लोक विशेषत: ही प्रथा पाळतात. ही परंपरा बुंदेलखंडात खूप जुनी आहे. अशाप्रकारे चोरून आणलेल्या मूर्तीची पूजा केल्याने, पुढील गणेशचतुर्थी पूर्वीच विवाह होत असल्याचा अनुभव इथल्या लोकांचा असल्याचे सांगितले जाते. ज्यांचा विवाह ठरत नाही, असे तरुण तरुणी गणेशाची मूर्ती चोरून आणतात. यात त्यांच्या घरातील वडिलधारी मंडळीही प्रोत्साहित करीत असते. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींची नदीघाटावरून किंवा मंडपातून चोरी केली जाते.