माझा 'अग्निपथ' चित्रपट अनेकांच्या लक्षात आहे. मी कधी अलिबागला गेलो तर त्यातील डायलॉग मला नक्कीच आठवतो.. 'काका...' असं म्हणून कोणीतरी हाक मारतंच. त्या चित्रपटात माझे संवाद अगदीच कमी होते. खरंतर माझे डायलॉग म्हणजे, फक्त शिव्याच होत्या. माझा चुलत भाऊ मुकुल आनंद याचा तो चित्रपट होता. त्यानं मला फक्त एवढंच सांगितलं होतं की, तुला फारसे डायलॉग नाहीत. पण, भरपूर शिव्या आहेत. मनसोक्त शिव्या दे.. तुला एवढंच सांगेन की, ही भूमिका करताना तुला मजा येईल. मी तेवढ्या शब्दावर काम करत राहिलो. प्रत्येक शॉटमध्ये साधारणपणे २०० जणांची गर्दी असे. सगळे ज्युनिअर आर्टिस्ट मुंबईहून गोव्याला जिथे सेट लावला होता, तिथे आले होते. माझ्या प्रत्येकच सीनमध्ये शिव्या असत. आणि त्या लोकांनी कधीच असं ऐकलेलं नव्हतं की कोणी अभिनेता इतका शिव्या वगैरे देत असेल.
माझी भूमिकाच वेडसर माणसाची होती. जो दगड मारत असतो किंवा शिव्या देत असतो. माझ्या प्रत्येक सीननंतर, डायलॉगनंतर टाळी मिळत होती. त्याचं तर अमिताभ आणि डॅनीलाही आश्चर्य वाटलं होतं की, याला प्रत्येकच सीननंतर कशी टाळी मिळते..? एकदा तर डॅनी माझ्या त्या कॅरेक्टरवर इतका चिडला होता की, त्यानं दिग्दर्शकाला सांगितलं की जर त्यानं मला शिवी दिली तर मी तिथेच त्याला गोळी घालेन. मग आम्ही एक युक्ती केली. डॅनीसोबतच्या माझ्या सीनमध्ये मी एकही शिवी येऊ दिली नाही. कारण, सीनमध्ये काहीही व्यत्यय नको होता. पण, डqबगच्या वेळी मात्र शिवीसह तो डायलॉग रेकॉर्ड केला. हीच तर एखाद्या अभिनेत्याची खासीयत असते. पण, ती भूमिका अविस्मरणीय ठरली. ते माझं काम आजही अनेकांच्या लक्षात आहे.