चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी आता भारत सरसावला आहे. भारतातील युवा व्यापारी असलेल्या अभिषेक मेहरा या तरुणानंही नुकतंच एक धाडसी पाऊल उचललं आहे. अभिषेक मेहरा या युवा व्यापाऱ्यानं चिनी कंपनीसोबत असलेला चक्क साडेचार कोटींचा करार तोडून टाकला आहे. मागील २० वर्षांपासून अभिषेकची कंपनी चीनसोबत व्यापार करत आली आहे. सिएल मेहरा या नावानं मेहरा कुटुंबीय हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा व्यवसाय करत आहे. आपल्या या धाडसी निर्णयावर बोलताना अभिषेक म्हणाला की, चीनच्या कुरापती सीमाभागात अद्याप कायम आहेत. यासाठी चीनसोबतचे सर्व आर्थिक व सामाजिक संबंध तोडणं गरजेचं आहे. चीनमधील हायर इंडिया कंपनीसोबत असलेला साडेचार कोटींचा करार आम्ही रद्द केला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिनी आहेत. अशा परिस्थितीत चिनी लोकांसोबत आम्ही काम करत असू तर आमच्या भारतीय असण्याला काहीच अर्थ उरत नाही, असं अभिषेक यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितलं आहे.