ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधेचा कहर झाला असून नवी मुंबईत ४४ प्रतिबंधित क्षेत्रांत सोमवारपासून ५ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवलीतही प्रतिबंधित क्षेत्रांत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यवहारांवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
अंबरनाथ, तसेच रायगड जिल्ह्यातील पेणमध्येही रुग्णसंख्या वाढत चालल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रांत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २७४७९ झाली असून, आत्तापर्यंत ९११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.