बाहेरून येणाऱ्यांवर पोलिस करणार कारवाई असल्याचा इशारा
यंदाच्या आषाढी वारीला गर्दी होऊ नये म्हणून पंढरपूर शहरात सोमवारपासून (२९ जून) २ जुलै, असे चार दिवस संचारबंदी लागू केली जाणार आहे. तसेच, या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी केली जाणार आहे. कोणी पंढरीत जात असल्याचे निदर्शनास आले, तर कारवाई केली जाईल, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. नागरिकांनी आषाढी वारीच्या काळात पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरवर्षी पंढरीत येणाऱ्या भाविकांना पोलिस प्रशासन मदत करत होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांना शासनाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आषाढीसाठी सुमारे १५०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. पंढरपूरला येण्यासाठी आता राज्यातून परवानगी देणे बंद केले आहे. तरी देखील जिल्हा प्रवेश, तालुका प्रवेश आणि शहराच्या लगत अशा तीन ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. या ठिकाणी २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
दुसरीकडे आषाढीसाठी पंढरीत गर्दी होऊ नये म्हणून सोमवारपासून चार दिवसांसाठी संचारबंदी लागू केली जाणार आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच, प्रत्येक पोलिसाला १० मास्क, सी व्हिटॅमिनच्या गोळ्या, फेस शिल्ड आणि रेनकोट असे साहित्य दिले आहे. या शिवाय रोज कर्मचाऱ्यांचे थर्मल टेस्टिंग आणि इतर तपासणी करणार असल्याची माहिती उप-विभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली.