जनतेच्या आकांक्षा साकार करण्यासाठी आम्ही संकल्प बद्ध : पंतप्रधान मोदी

Sandyanand    30-May-2020
Total Views |

modi_1  H x W:


वर्ष पूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांच्या नावाने पत्र लिहिले म्हणाले - विश्वामध्ये भारताची शान वाढली, सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय यादरम्यान घेतले 

 
भारतीयांचे सामूहिक सामर्थ्य आणि क्षमता अभूतपूर्व आहे.
देशवासीयांच्या इच्छा- आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आम्ही खूपच जलदगतीने मार्गक्रमण करीत होतो, तेव्हढ्यात कोरोना जागतिक महामारीने भारतालाही विळखा घातला. एकीकडे अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि विशाल अर्थव्यवस्था असलेल्या जगातील मोठ्या मोठ्या महासत्ता आहेत तर दुसरीकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आणि अनेक आव्हानांनी ग्रासलेला आपला भारत देश आहे. परंतु आज सर्व देशवासीयांनी भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला आहे. तुम्ही हे सिद्ध केले आहे कि जगातील सामर्थ्यवान आणि संपन्न देशांच्या तुलनेत भारतीयांचे सामूहिक सामर्थ्य आणि क्षमता अभूतपूर्व आहे.

 
'मोदी-२' सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले व केंद्र सरकारच्या सफलतेचा पाढा वाचला. ते पुढे म्हणाले, एक वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवीन सोनेरी अध्याय जोडला गेला. देशात अनेक दशकांनंतर पूर्ण बहुमताच्या एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा जनतेने जबाबदारी सोपवली होती. हा अध्याय रचण्यात तुमची खूप मोठी भूमिका होती. म्हणूनच आजचा हा दिवस तुम्हाला वंदन करण्याची, भारत आणि भारतीय लोकशाही प्रति तुमच्या या निष्ठेला प्रणाम करण्याची माझ्यासाठी संधी आहे. जर परिस्थिती सामान्य असती तर मला तुम्हाला भेटून तुमचे दर्शन घेण्याचे सौभाग्य लाभले असते. मात्र कोरोना या जागतिक महामारीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत या पत्राद्वारे तुमच्या चरणी नमन करायला आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मागील वर्षात तुमचा स्नेह, शुभ आशीर्वाद आणि तुमच्या सक्रिय सहकार्याने मला कायम एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा दिली आहे. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, त्या कार्यकाळात जगात भारताची आन-बान-शान तर वाढलीच, त्याचबरोबर आम्ही गरीबांची बँक खाती उघडली, त्यांना मोफत गॅस जोडणी, मोफत वीज जोडणी दिली, शौचालये, घरे बांधून गरीबांची प्रतिष्ठा देखील वाढवली. त्या कार्यकाळात सर्जिकल हल्ला झाला, हवाई हल्ला झाला, तसंच आम्ही एक पद एक निवृत्तीवेतन, एक देश एक कर - GST, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या किमान हमी भावाच्या मागण्या देखील पूर्ण करण्याचे काम केले. तो कार्यकाळ देशाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित होता. वर्ष २०१९ मध्ये तुमचा आशीर्वाद, देशाच्या जनतेचा आशीर्वाद, देशाच्या भव्य स्वप्नांसाठी होता, आशा-आकांक्षाच्या पूर्ततेसाठी होता. आणि या एक वर्षात घेण्यात आलेले निर्णय याच भव्य स्वप्नांची झेप आहे. आज जन-जन शी निगडित जनामनाची जनशक्ति, राष्ट्रशक्तिची चेतना प्रज्वलित करत आहे. मागील एका वर्षात देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले, आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली. भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात देशातील प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक व्यक्तिने उत्तम प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हा मंत्र घेऊन आज देश सामाजिक असो, आर्थिक असो, जागतिक असो किंवा आंतरिक, सर्वच दिशांनी पुढे वाटचाल करत आहे. पंतप्रधान म्हणाले, गेल्या एक वर्षात काही महत्वपूर्ण निर्णय अधिक चर्चेत राहिले आणि त्यामुळेच ते यश आठवणीत राहणे अगदी स्वाभाविक आहे. 

राष्ट्रीय एकताअखंडतेसाठी कलम ३७० असेल, अनेक तपांच्या जुन्या संघर्षाचा सुखद परिणाम - राम मंदिर बांधायला परवानगी असेल, आधुनिक समाज व्यवस्थेत अडथळा बनलेला तीन तलाक असेल, किंवा मग भारताच्या करुणेचे प्रतीक नागरिकत्व सुधारणा कायदा असेल, ही सर्व कामगिरी तुमच्याही स्मरणात आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या या ऐतिहासिक निर्णयांमध्ये अनेक निर्णय, अनेक बदल असेही आहेत ज्यांनी भारताच्या विकास यात्रेला नवी गती दिली आहे, नवी उद्दिष्टे दिली आहेत, लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण केल्यामुळे सैन्यात समन्वय वाढला आहे तसेच गगनयान अभियानाच्या तयारीसाठीसुद्धा भारताने वेग वाढवला आहे. यादरम्यान गरीब, शेतकरी, महिला-युवा यांचे सक्षमीकरण करण्याला आम्ही प्राथमिकता दिली आहे. आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत ९ कोटी ५० लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. देशातील १५ कोटीपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जल जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे. आमच्या ५० कोटीपेक्षा जास्त पशुधनाच्या चांगल्या आरोग्यासाठी मोफत लसीकरणाचे व्यापक प्रमाणावर अभियान राबविण्यात येत आहे. 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिक या सर्वांसाठी वयाच्या साठीनंतर नियमितपणे मासिक ३ हजार रुपए निवृत्तीवेतन देण्याची सोय सुनिश्चित करण्यात आली आहे. मच्छीमारांची सवलत वाढविण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या सुविधा वाढविणे आणि सागरी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विशेष योजनांबरोबरच वेगळा विभागही बनविण्यात आला आहे. याचबरोबरीने व्यापाऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी व्यापारी कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वयंसहायता बचत गटातील सुमारे ७ कोटी भगिनींना आता जास्तीची आर्थिक मदत देण्यात येत आहे. नुकतेच बचत गटांसाठी विनाहमी कर्जाची मर्यादा १० लाखावरून दुप्पट म्हणजे २० लाख रुपये करण्यात आली आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा विचार करून देशात ४५० हून जास्त नवीन एकलव्य पद्धतीच्या निवासी शाळांच्या निर्मितीचे अभियान सुरु करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हिताशी निगडित चांगले कायदे तयार होण्यासाठीसुद्धा गेल्या वर्षभरात अतिशय वेगाने कार्य झाले आहे. 

आमच्या संसदेने तिच्या कामकाजाद्वारे दशकांपूर्वीचा उच्चांक तोडला आहे. जागतिक महामारीमुळे, हा संकटाचा काळ तर आहेच मात्र आपणा देशवासीयांसाठी संकल्प करण्याचीही वेळ आहे. कोणतीही आपत्ती १३० कोटी भारतीयांचा वर्तमान किंवा भविष्य काळ निश्चित करू शकत नाही हे आपण कायम स्मरणात ठेवायचे आहे. आपण आपला वर्तमान काळ आणि भविष्य काळही स्वतः च निश्चित करू. आपण पुढे जात राहू, प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत राहू, आपण विजयी होऊ. आपल्याकडे म्हटले गेले आहे- 
कृतम् मे दक्षिणे हस्ते, जयो मे सव्य आहितः।।
म्हणजे आपल्या एका हातात कर्म आणि कर्तव्य आहे तर दुसऱ्या हातात यश सुनिश्चित आहे. हा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.