मुलांनो इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या-त्या काळातील नाण्यांचा समावेश होत असतो. त्या काळी आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती कशी होती अशा आणि कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात.
नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आहतही सर्वात जुनी भारतीय नाणी.
२६०० वर्षांची अखंडित परंपरा भारतीय नाण्यांना लाभली आहे. आदिमानवाच्या काळात चलन नव्हते. धातूची कडी, अंगठ्या, गोळे, दागिने इत्यादी वापरले जात असे. कालांतराने विशिष्ट आकाराच्या, वजनाच्या धातूच्या तुकड्यांवर त्यातील वजन, शुद्धता, मूल्य यांची खात्री देणारी चिन्हं उमटवली गेली. पुढे हे चिन्ह उमटवलेले धातूंचे तुकडे तो- तो राजाच पाडू लागला. त्यांनाच नाणी म्हणतात.
भारतीय नाणी पाहताना असंख्य सत्ता व त्यांचा काळ यांचा मोठा इतिहास उभा राहतो. स्वातंत्र्यापर्यंत भारतात एकछत्री अंमल कधीही नव्हता. मुघल काळात बहुतेक बादशहांनी नाणी काढली होती. त्यावेळी हिंदुस्थानात सुमारे २०० ठिकाणी मोगलांच्या टांकसाळी होत्या. इंग्रजांची भारतात सत्ता होती तेव्हाही नाणी काढली गेली त्यामुळेच भारतीय नाण्यांत विविधता आढळते.