आई आणि तिच्या मुलांमधील नाते हे घट्ट बंधांनी बांधलेले असते. आईसाठी मुलगा कितीही मोठा झाला तरी तिच्यासाठी ते मूलच असते. त्यामुळेच सगळे जग जरी मुलाच्या विरोधात गेले तरी आई मात्र मुलाच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. बदलत्या काळात मुले शिक्षण, नोकरी आणि करिअरच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात आणि मग तिथलीच होऊन जातात. ते स्वतःच्या कामात आणि संसारात इतके गढून जातात की त्यांना आई-वडिलांची आठवणही येत नाही. पण आईचे मात्र मुलावर असणारे प्रेम कणभरही कमी झालेले नसते.
तिच्या सहवासात राहण्यासाठी वेळ काढा. अनेकदा मुले मोठी झाली, संसारात रमली की ती आईवडिलांना गृहीत धरून चालतात. नोकरी-व्यवसाय, रोजची धावपळ यामध्ये आपण आईवडिलांसाठी काही वेळ काढायचा असतो. आवर्जून वेळ काढून शांतपणे त्यांच्याजवळ बसून गप्पा मारायच्या असतात हे मुले विसरून गेलेली असतात. तुमची धावपळ पाहणारे आईवडील त्याबद्दल तुम्हाला काही बोलणार नाहीत पण तुम्ही वेळ काढून त्यांच्याशी गप्पा मारल्या तर नक्कीच त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढेल आणि आनंद होईल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आईबरोबरील नाते हे अतिशय महत्त्वाचे असते आणि ते सतत नवनव्या पातळीवर पोचत असते. अशा या आईला नात्याचा विश्वास देण्यासाठी काय करावे?
तुम्ही तिचा स्वभाव, विचार बदलू शकत नाही हे मान्य करा. द बुक यू विश युवर पेरेन्टस् हॅड रीड या पुस्तकाच्या लेखिका आणि मानसोपचार तज्ज्ञ फिलिपा पेरी म्हणतात, तुम्ही जगात काहीही बदलू शकता पण आईला बदलू शकत नाही. पण कधीकधी तुम्ही स्वतःला बदलले तर समोरची व्यक्ती देखील बदलते. तुम्ही आईशी प्रेमाने आणि आस्थापूर्वक वागलात आणि तिला आहे तशी स्वीकारण्याची भूमिका ठेवली तर तुमचे नाते अधिक समृद्ध होईल. मात्र हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. ही एक शक्यता आहे.
आपल्या आधीच्या पिढीकडे निश्चितपणे बालपणाच्या अधिक रसरशीत आठवणी असतात. घरातील शिस्त, भावंडे, सण साजरा करण्याच्या पद्धती, एकोपा, सगळ्या गोष्टी वाटून घेण्याची वृत्ती, शाळा आणि अभ्यास या सगळ्यांमध्ये एक मोकळेपणा आणि निरागसता होती. त्यामुळे त्यांच्या बालपणाविषयी विचारले तर आई सुरुवातीला नकार देईल, आढेवेढे घेईल पण नंतर तिच्या भावंडांच्या, घराच्या, आईवडिलांच्या आठवणी भरभरून सांगेल. त्यातून तुम्हाला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी गवसतील.
तिच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि आवडत नाहीत त्या तिला सांगा. तिच्या कोणत्या गोष्टींचा तुम्हांला राग येतो आणि तुम्हांला तिच्या कोणत्या आठवणी लक्षात आहेत हे सांगा. त्यातून तुमचे तिच्याकडे किती बारकाईने लक्ष असते हे तिला समजेल. तिच्याशी नेहमी मायेने वागा.
पिढ्यांमधील फरक संवेदनशीलतेने जाणून घ्या. मात्र हे करताना पूर्वग्रह ठेवून विचार करू नका. आपले पालक अनेक अर्थांनी वेगळ्या परिस्थितीत वाढले, जगले, असे नॉटिंगहॅम विद्यापीठातील न्यायवैद्यक आणि कौटुंबिक मानसशास्त्र केंद्राचे संचालक केव्हिन ब्राऊनी यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांची सामजिक आणि राजकीय मते तुम्हांला पटणार नाहीत हे गृहीत धरून त्यांच्याशी संवाद करा. संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे. आईचे बालपण कुठल्या गावात गेले, शिक्षण आणि बालपणातील जडणघडण कशी होत गेली, हे लक्षात घेतले तर ती तुमच्या बोलण्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते हे तुम्हांला कळू शकेल.
तिच्या सध्याच्या जीवनाविषयी विचारा. तिला फक्त संध्याकाळी देवाला दिवा लावण्यात आणि टीव्हीवरील मालिका पाहण्यातच रस आहे, असे समजून चालू नका. आणि तसे असले तरी त्यातूनही तिला तुम्हांला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्या असू शकतात.
वयानुसार आलेल्या मर्यादा लक्षात घ्या. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यावर अनेक मर्यादा आलेल्या असतात. कमी दिसणे, ऐकू कमी येणे, चालण्यासाठी आधाराची गरज भासणे, चिडचिड होणे अशा गोष्टी घडत असतात. अशा गोष्टींवरून त्यांना चुकूनही बोलू नका. कारण या त्यांच्या नियंत्रणातील गोष्टी नसतात. त्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा विचार करा. कुटुंबातील प्रत्येकाने त्यांची काळजी घेताना त्यांना निरपेक्ष प्रेम दिले पाहिजे.
त्यांच्याकडे कधीही भावंडांच्या तक्रारी करू नका. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एका टप्प्यानंतर त्यांची सगळी मुले स्वतंत्रपणे जगू लागलेली असतात. अशावेळी आईवडिलांच्या नियंत्रणात खूप कमी गोष्टी असतात किंवा आता त्यांचा सल्ला घ्यावा असे कुणाला वाटत नसते. अशा स्थितीत तुम्ही त्यांच्याकडे भावंडांच्या तक्रारी केल्या तर ते काही बोलणार नाहीत पण आपण काहीच करू शकत नाही याची त्यांना मनोमन खंत वाटत राहते.