
ज्ञानेश्वरी बहुजनांस प्रिय झाली याचे मुख्य कारण असे की, तिने कोणतेच कर्मकांड लोकांच्या मागे लावलेले नाही. यज्ञयाग, पूजापाठ, तीर्थयात्रा, दानधर्म, व्रतवैकल्ये, सकाम भक्ती इत्यादींना दूर सारून ईश्वराच्या प्राप्तीचा सर्वांत सुलभ असा मार्ग ज्ञानेश्वर हळूहळू या अध्यायात खुला करीत आहेत. मागील ओवीत सर्व दिवसांतील एखादा क्षण मला अर्पण कर, असे भगवंतांनी सांगितले. हजारो वर्षे तपश्चर्या करण्याची गरज नाही. इंद्रियांचा निग्रह, वासनांचा त्याग यांचीही जरुरी नाही. असा एक क्षण देण्याचे जमले नाही. तरीही भगवंत आपल्या भक्तांना आधार देत आहेत. ते म्हणतात की, तू काही न करताच जेथे आहेस, तेथे स्थिर राहा. आपल्या कुळातील आचरण नीट पाहा. निषिद्ध कर्म करू नकोस आणि शास्त्रपूत कर्मे मात्र आचरीत जा. म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागायला मोकळीक झाली. तुझ्यावर कोणतीच जबाबदारी उरली नाही. ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे, ती एखादी गोष्ट करणे वा न करणे हे सर्व जाणतो. कर्मात काही कमीपणा झाला, तर जीवाने व्यर्थ कष्टी होऊ नये. आपल्या प्रवृत्तीनुसार तू कर्मे करीत राहा. ही कर्मे कशी करावीत? ज्ञानेश्वरांनी उत्तम दृष्टांत देऊन सांगितले आहे की, माळ्याने पाट तयार करून जिकडे पाणी न्यावे तिकडे ते जाते. रस्ता सरळ आहे की आडमार्गी आहे, याची qचता रथास कधी नसते. रस्त्यातील खाचखळगे सारथी पाहून घेईल.