काेल्हापूर, 21 ऑगस्ट (आ.प्र.) :
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामांची अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चार तास पाहणी केली. त्यानंतर आवारातच समितीची पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डाॅ.
विलास वहाने यांच्यासाेबत रात्री उशिरापर्यंत बैठक झाली.
अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 147 काेटी रुपयांत मंदिराचे जतन संवर्धन केले जात आहे. ही कामे पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहेत. मात्र, मागील महिन्यात कृती समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी पुरातत्त्व विभागाच्या कामांवर आक्षेप घेतला हाेता. हे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचे सांगून देखरेख करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी, अशी मागणी केली हाेती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डाॅ. विजय राठाेड यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची नियु्नती केली आहे.
यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक चंद्रशेखर दिघावकर, भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर व शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख अविनाश पाटील यांचा समावेश आहे. या तज्ज्ञांनी दुपारी चारला मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. डाॅ. वहाने यांनी त्यांना काम कशा पद्धतीने केले जात आहे, याची माहिती दिली. मणिकर्णिका कुंड, नगारखाना व गरुड मंडपाच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली.
मंदिरातील मुख्य गाभारा, कासवचाैक, गणपती चाैकासह आवारातील ओवऱ्या, अन्य मंदिरांचे दगडी बांधकाम, खांबांच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. डाॅ. वहाने व स्थानिक तज्ज्ञ अधिकारी अमाेल राठाेड यांनी संवर्धन कामाबाबत दाखल झालेल्या तक्रारींचे निरसन केले. त्यानंतर नागरिकांनी आक्षेप घेतलेल्या विषयांवर तसेच पुरातत्त्व विभागाच्या कामाच्या पद्धतीची माहिती घेतली.