हैदराबाद, 29 जुलै (वि.प्र.) : भारतीय मिठाईची पसंती जगभरात वाढत आहे. 1.5 लाख काेटी रुपयांची उलाढाल असलेली भारतातील मिठाई आणि नमकीन बाजारपेठ आता केवळ सणासुदीच्या काळात देशांतर्गत उपभाेगली जाणारी बाब राहिलेली नाही. तिला जागतिक स्तरावरही माेठी पसंती मिळत आहे. तसेच, केवळ परदेशस्थ भारतीयांपुरती मर्यादित न राहता, आता परदेशी नागरिकांमध्येही याचा खप वेगाने वाढत आहे.
वर्ल्ड मिठाई अँड नमकीन कन्व्हेन्शन 2026 च्या निमित्ताने बाेलताना, फेडरेशन ऑफ स्वीट्स अँड नमकीन मॅन्युफॅक्चरर्सचे महासंचालक फिराेज नकवी यांनी सांगितले की, भारतातील मिठाई आणि नमकीन उत्पादनांपैकी सुमारे 10% उत्पादनांची निर्यात केली जाते. या निर्यातीत दरवर्षी 10% पेक्षा अधिक वाढ हाेत आहे.
भारतीय गुलाबजाम हे आता युनायटेड किंगडममधील सर्वांत लाेकप्रिय मिष्टान्नांपैकी एक बनले आहेत. आग्नेय आशियाई देशांमध्येही त्यांची मागणी वाढत आहे, असे नकवी यांनी सांगितले.
युराेपमध्ये, जिथे मिष्टान्नांच्या बाजारपेठेवर प्रामुख्याने चाॅकलेट-आधारित पदार्थांचे वर्चस्व आहे, तिथेही ग्राहक आता भारतीय मिठाईंची चव आवडीने घेत आहेत.
गुलाबजाम आणि रसगुल्ला यांच्यासाेबतच साेनपापडी आणि म्हैसूर पाक हे पदार्थही आता परदेशातील मिष्टान्नांच्या मेनूमध्ये स्थान मिळवत आहेत.
या कलामुळे प्रस्थापित उत्पादकांमध्ये उत्साह संचारला आहे. आम्ही अनेक दशकांपासून मिठाईची निर्यात करत आहाेत. परंतु, अलीकडच्या काळात त्यास माेठी मागणी निर्माण झाली आहे, असे हल्दीराम्सचे संचालक नीरज अग्रवाल यांनी सांगितले. नागपूरस्थित असलेली ही मिठाई आणि नमकीन उत्पादक कंपनी आपली उत्पादने अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जपान आणि आग्नेय आशियाई बाजारपेठांसह इतर अनेक देशांमध्ये निर्यात करते.
वाढत्या मागणीमुळे कंपन्या स्वतंत्र उत्पादन सुविधा उभारण्यास प्रवृत्त हाेत आहेत. हैदराबादस्थित दादू मिठाई वाटिका शहरात निर्यातीसाठी एक विशेष स्वयंपाकघर उभारणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दादू यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच कार्यान्वित हाेणाऱ्या या सुविधेमध्ये परदेशातील बाजारपेठांसाठी माेतीचूर लाडूंचे उत्पादन केले जाईल.