शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी थेट व्हिडिओ काॅलद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांचे काैतुक केले. निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रयाेगशाळा ठरत आहे.विशेष म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9, अशी 12 तास विद्यार्थ्यांसाठी ही शाळा कार्यरत असून, वर्षभर सातत्याने विविध शैक्षणिक आणि काैशल्याधारित उपक्रम तेथे राबवले जातात, या उपक्रमांचे भुसे यांनी काैतुक केले. शाळेत शेती, परसबाग, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आणि प्रयाेगात्मक शिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
त्यामुळे शिक्षण अधिक आनंददायी, उपयुक्त आणि जीवनाभिमुख बनले आहे. शाळेतील शिक्षक केशव गावित यांच्या उपस्थितीत भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययनाची माहिती घेतली. तसेच, विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. दुर्गम भागातील हिवाळी पाडा शाळेने शिक्षण, स्वच्छता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून राज्यासमाेर आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ शाळा, शिस्तबद्ध विद्यार्थी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे.विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक, प्रशासनाने संयुक्तपणे कार्य करणे आवश्यक आहे, असे भुसे यांनी सांगितले.