आदिवासी समाजाने शिक्षण, काैशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या 126व्या बलिदान दिनानिमित्त लाेकभवनात आयाेजित कार्यक्रमात राज्यपाल बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डाॅ. अशाेक वुईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह लाेकप्रतिनिधी, वेगवेगळया भागांतून आलेले आदिवासी, कलाकार आदी उपस्थित हाेते. आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी आणि आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट आश्रमशाळा, उच्च शिक्षणाच्या संधी, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन, पीएच.डी. शिष्यवृत्ती; तसेच परदेशी शिक्षणासाठी आर्थिक साह्य यासारखे अनेक उपक्रम राबवले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमात शिवा दिघे आणि कलाकारांनी सादरीकरण केले तसेच लाेकभवनात वृक्षाराेपण करण्यात आले.