आयुर्वेद व याेगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्याची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार हाेत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही हाेणे आवश्यक आहे. हा केवळ शासनप्रशासनाचा उपक्रम न राहता लाेकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी येथे केले.केंद्रीय आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनतर्फे येथे आयाेजित राष्ट्रीय आराेग्य मेळाव्याचे उद्घाटन करताना राष्ट्रपती बाेलत हाेत्या.राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश काेटेचा, आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष प्रा. राकेश शर्मा, महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. देवेंद्र त्रिगुणा आदी यावेळी उपस्थित हाेते.भारतीय आहारपद्धतीत पूर्वापार औषधी तत्त्वे असलेल्या वनस्पतींचा वापर हाेत आला आहे.
व्यक्तीला कधीही आजारपण उद्भवू नये, अशी साेय आपल्या पारंपरिकज्ञानावर आधारित जीवनपद्धतीत हाेती.आता आहारात अनावश्यक पदार्थांचा अंतर्भाव झाल्याने आजार वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुर्वेद व आयुषपद्धतींचा प्रसार अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.निरामय जीवनशैली, ‘वेलनेस’ व ‘समग्र स्वास्थ सुरक्षा’ ही ‘आयुष’ची आधारशीला आहे. देशातील प्राचीन व पारंपरिक आयुष पद्धतीच्या संवर्धन व अवलंबामुळे आपला देश संपूर्ण जगात अग्रेसर ठरेल. औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ हाेईल, असे प्रतापराव जाधव यांनी सांगितले.मकरंद जाधव यांनीही मनाेगत व्यक्त केले. आयुर्वेद क्षेत्रासाठी याेगदान देणाऱ्या ज्येष्ठ वैद्यांना यावेळी गाैरवण्यात आले.गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डतर्फे आयुष मंत्रालयाला मिळालेले प्रमाणपत्र राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.