मुंबई, ठाण्यातील स्थितीचा शिंदे यांच्याकडून आढावा

    22-Aug-2025
Total Views |
 
मुंबई (2)
 
मुंबई, 21 ऑगस्ट (आ.प्र.) : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली.
मुंबईतील मिठी नदी आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला. तसेच, विक्राेळी पार्कसाईट येथील दरडप्रवण परिसराची शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले.
 
ठाण्यातील नाैपाडा, तसेच काेपरीमधील चिखलवाडीत पाणी साचले आहे. हा परिसर सखल असल्याने तेथे जरा पाऊस झाला, की पाणी भरते. पंप लावून तेथील पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त साैरभ राव यांना दिले. शिंदे म्हणाले, की ठाण्यात 225 मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे काम सुरू असून, पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहाेत.
 
वांद्रे येथील मिठी नदीचा आणि नदीकाठच्या परिसराचाही शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. दाेन दिवसांपूर्वी विक्राेळी पार्कसाईट येथे वर्षानगर या डाेंगराळ वस्तीवर दरड काेसळली हाेती. या दरडप्रवण परिसराची शिंदे यांनी पाहणी केली. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांशीही फाेनवर चर्चा झाली.
 
मिठी नदी काठच्या परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके, बाेटी तैनात आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुसळधार पाऊस सुरू असून, नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.