ई-सेवा केंद्रामुळे नागरिक-न्यायालय दुवा मजबूत : महाजन

    14-Aug-2025
Total Views |
 
 ny
 
पुणे, 13 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
तंत्रज्ञान हे आजच्या न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ असून, महा ई-सेवा केंद्रामुळे माहिती मिळविण्याची गती वाढेल, पारदर्शकता टिकून राहील आणि न्याय मिळविण्याचा कालावधी कमी होईल. या केंद्रामुळे नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालय यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ई-कोर्ट इंडिया प्रकल्पाअंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे, बी. व्ही. वाघ, ए. एल. टिकले, पुणे बार अशोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंझाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅरा लीगल व्हॉलंटियर्स आदी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, ‌‘महा ई- सेवा केंद्र हे न्याय सुलभतेने प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे एक सशक्त माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व घटकांना विशेषतः न्यायालयात प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्या नागरिकांना या केंद्राचा मोठा लाभ होणार आहे.‌’ महा ई-सेवा केंद्राचे एकाचवेळी जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय आणि लघुउद्योग न्यायालय येथे उद्घाटन करण्यात आले असून, या ठिकाणी न्यायालयीन सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानयुक्त उपलब्ध होणार आहेत.
 
या केंद्राच्या माध्यमातून नागरिक, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रकरणांची माहिती, ई-फायलिंग, निकालपत्रे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ई-भेट, ई-कोर्ट मोबाइल ॲपबाबत मार्गदर्शन; तसेच इतर संगणकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यावेळी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा संगणक विभागाचे प्रमुख एस. एस. कंठाले यांनी महा-ई सेवा केंद्रामार्फत न्याय सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे सांगून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.