सार्वजनिक आराेग्य विभाग व टाटा कॅन्सर हाॅस्पिटलच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘कॅन्सरमुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प सिद्धीस नेऊ या, असे आवाहन आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.आबिटकर यांनी परळ येथील टाटा मेमाेरियल हाॅस्पिटलला भेट दिली.यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. आधुनिक कॅन्सर उपचार पद्धतीची माहिती घेतली. टाटा मेमाेरियल सेंटरचे ऑल इंडिया डायरेक्टर डाॅ. सुदीप गुप्ता, टाटा मेमाेरियल हाॅस्पिटल मुंबईचे डायरेक्टर डाॅ. सी. एस. प्रमेश, डेप्युटी डायरेक्टर श्रीखंडे, डेप्युटी डायरेक्टर सिद्धनाथ लष्कर, रुग्णालय सुपरिटेन्डन्ट डाॅ. विनीत सामंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.राज्य शासनाने महात्मा फुले जन आराेग्य याेजनेंतर्गत पॅकेजच्या दरात वाढ केली असून, अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. त्याचा कर्करुग्णांनाही फायदा हाेईल. राज्यातील खासगी रुग्णालयांनी महात्मा जाेतिरावफुले जन आराेग्य याेजनेंतर्गत कर्करुग्णांना उपचारपश्चात सेवा द्यावी. राष्ट्रीय आराेग्य अभियानाच्या माध्यमातून व टाटा कॅन्सर केअर हाॅस्पिटलच्या तांत्रिक सहकार्याने राज्यात 26 ठिकाणी डे-केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जिल्हास्तरावर त्यामुळे कर्करुग्णांना सेवा उपलब्ध हाेईल, असे आबिटकर यांनी सांगितले.