पुणे, 4 ऑक्टोबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
लोकमान्यनगर येथील सोसायट्यांच्या पुनर्विकासाला स्थगिती दिल्याने लोकमान्यनगर बचाव कृती समिती व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समितीच्या वतीने शुक्रवारी पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या कार्यालयाला शेकडो नागरिकांनी घेराव घातला. यावेळी नागरिकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्थगिती उठवावी, अशी मागणी केली. या प्रसंगी ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमान्यनगर बचाव कृती समिती, तर अजय बल्लाळ यांनी महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा कृती समिती येथील रहिवाशांची बाजू मांडली. नागरिकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
आम्हाला आमची स्वप्ने साकार करू द्या, आमच्या घरांवर, विकासकांवर आणलेली स्थगिती अगोदर उठवा, मगच चर्चा, अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी, गोंधळातच वादळी चर्चा झाली. आम्हाला आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या, तुम्ही आम्हाला गृहित धरू नका, म्हाडाने आणलेली स्थगिती त्वरित हटवा, आमचा आम्हाला विकास करू द्या, रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचा पुनर्विकास करू द्या.
यावेळी नागरिकांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहुल समोरे यांना भेटून निवेदन दिले. गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला खीळ बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या. नागरिक म्हणाले, की लोकमान्यनगर येथील काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरक यातना सोसत येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. येथील सर्व इमारती को-ऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे.
सेल डीड, लीज डीड, कन्व्हेन्स डीड झाले असूनदेखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा येथील नागरिकांनी बोलताना सांगितले, की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करत आहोत. म्हाडाने आणि राज्य शासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे. शासनाकडून त्वरित दखल जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असून, हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर कृती समिती व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्या वतीने सांगण्यात आले.
म्हणून म्हाडा महासंघाची स्थापना केली ः
ॲड. गणेश सातपुते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) महाराष्ट्रभर गृहनिर्माणाची कामे करते आहे. मात्र महाराष्ट्रभर आपण पाहिले, तर म्हाडाच्या बांधकामांची आणि नागरिकांची अवस्था चिंताजनक आहे. तेथील बांधकामांचा पुनर्विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून म्हाडा महासंघ काम करेल, असे ॲड. गणेश सातपुते यांनी सांगितले.